
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात आज दि.२८ मे रोजी दुपारच्या वेळी आलेल्या चक्रीवादळामुळे भंडारा, मोहाडी आणि लाखनी तालुक्यातील काही गावांमध्ये मोठे नुकसान झाले. चक्रीवादळामुळे अनेकांच्या घरावरील कौलारू, टीनाचे छप्पर उडून गेले, तर अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि झाडे उन्मळुन पडली. या सर्व गोंधळात तीन जनावरांचा मृत्यू झाला. दुपारी अचानक आलेल्या वादळाने काही करायच्या आतच होत्याचे नव्हते केले.
आज दुपारी एक वाजताच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाखवणारे. मात्र पाऊस न पडता भंडारा तालुक्यातील चिचोली पुनर्वसन, बोरगाव, मोहाडी तालुक्यातील कांद्री आणि लाखनी तालुक्यातील गोठणगाव यासारख्या ठिकाणी वादळाने प्रचंड गोंधळ घातला. यावेळी चक्रीवादळासारखी स्थिती निर्माणझाली. चिंचोली येथील अनेक घरावरची कौलारू आणि टिनाचे छपरे वाºयाने उडून गेले. गावातील ४ ते ५ विजेचे खांब कोसळून पडले. तर अनेक झाडे मळून पडली. जनावरांचे गोठे पडल्याने ३ जनावारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कांद्री आणि गोठणगाव परिसरातही हेच चित्र पाहायला मिळाले. दुपारी दीड वाजताच्या सुमारास आलेल्या वादळाने काही क्षणातच होत्याचे नव्हते केले. या वादळाने अनेकांना बेघर केले. वादळानंतर सावरासावर करताना लोकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सोबत ओढविलेल्या संकटाचे दु:ख त्यांच्या चेहºयावर स्पष्ट दिसत होते.