प्रफुल्ल पटेल यांची जिल्हाधिकाऱ्यांसह चर्चा : शेतकऱ्यांची अडचण त्वरित दूर करा
यंदा दिवाळी संपत आली तरी शासकीय धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून शासनाच्या दप्तर दिंरगाईमुळे त्यांना खासगी व्यापाऱ्यांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात दोन्ही जिल्ह्यातील सर्व शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासंदर्भात खा. प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय मुन यांच्या सह संबधित अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा करुन शासकीय आधारभूत केंद्र सूरू करण्याचे निर्देश दिले.
खरीप हंगामातील धानाची कापणी आणि मळणी सध्या जोमात सुरु असून शेतकरी धानाची मळणी करुन ते विक्री करण्यासाठी बाजारपेठेत आणत आहे. मात्र गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात अद्यापही एकही धान खरेदी केंद्र सुरु झालेले नाही. त्यामुळे शेतकऱी संकटात सापडला आहे. शासनाने यंदा धानाला २०४० रुपये हमीभाव जाहीर केला. पण या धानाची खासगी व्यापाऱ्या विक्री केल्यास १४०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. जिल्ह्यात अद्यापही धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी खा. पटेल यांना निवेदन देवून धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती.
अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेता जिल्ह्यात त्वरित सर्व शासकीय धान खरेदीे केंद्र सुरु करावी अशी मागणी खा.पटेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान केली. तर उद्या गुरुवारी भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री विनय मून संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करणार आहेत.