भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : ग्रामपंचायतींमध्ये सरपंच म्हणून निवडून आलेल्या अनेक महिलांच्या पतींचा किंवा अन्य नातेवाइकांचा कामकाजात वाढता हस्तक्षेप पाहायला मिळतो. पडद्याआडून पुरुषच सत्तेची सूत्रे हलवत असल्याचे निदर्शनास येते. या विचारांना फाटा देत स्त्रीचे अस्तित्व चूल व मुलं इथपर्यंत शिल्लक न ठेवता थेट राजकारणाची सूत्रे पूर्णपणे महिलेच्या हाती देऊन गावातील राजकारणात कोणते सकारात्मक बदल घडू शकतात, हे मोहाडी तालुक्यातील खडकी गावात आयोजित ‘सुन सांभाळा पाटलीनबाई’ या नाटकाच्या माध्यमातून नाट्य रसिकांच्या समोर सादर करण्यात आले. मोहाडी तालुक्यातील खडकी (पालोरा) येथे परिवर्तन पॅनलच्या वतीने तीन अंकी लावणी प्रधान ‘सुन सांभाळा पाटलीनबाई’ या नाटकाचे आयोजन दिनदयाल मदनकर यांच्या भव्य आवारात बुधवारी रात्री ९ वाजता करण्यात आले होते.
नाट्य कलावंत हिरालाल पेंटर यांच्या राजसा रंगभुमी वडसा यांच्या संपूर्ण संचासाहित नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. प्रेक्षकांसाठी हा नाट्य प्रयोग मोफत होता. महिला सरपंच असली, तर पती आणि नातेवाईक तिच्या कामात हस्तक्षेप करीत असल्याचे अनेक ठिकाणीअनुभवयास मिळते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र महिला सरपंच असलेल्या बहुतांश गावांमध्ये त्यांचे पतीच ग्रामपंचायतींचा कारभार चालवताना दिसतात. अनेकदा वरिष्ठ राजकिय नेते गावातील सरपंचांवर दबावतंत्राचा वापर करतात. मग गावात जर सरपंच महिला असेल, तर त्यांचा सर्व मनमर्जी कारभार असतो. गावातील विकासकामांच्या नावे करोडो रुपयांचा निधी घशात घालून लोकांसमोर दुधप्रमाणे शुभ्र असल्याचा देखावा करणाºया नेत्यांच्या विरोधात जाऊन गावाच्या विकासासाठी वेळप्रसंगी कुटुंबातील सदस्यांसी संघर्ष करणाºया महिला सरपंचाची कहाणी या नाटकात उत्कृष्टपणे रेखाटण्यात आली होती.