भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : आदर्श विद्यालयातील स्वयंपाकी महिलांना साहित्य चोरीच्या आरोपावरून व्यवस्थापन मंडळाने कामावरून काढले होते. या अन्यायकारक निर्णयाचे विरोधात सोमवार २ आॅक्टोंबर पासून महिलांनी शाळेच्या गेटवरच आमरण उपोषण सुरू केले होते. आज गुरुवार ५ आॅक्टोंबर रोजी आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी स्वयंपाकी महिलांना शर्ती व अटीच्या आधारावर कामावर घेण्याचा निर्णय घेत लिंबूपाणी पाजून उपोषण सोडविण्यात आले. शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के, आरोग्य व शिक्षण सभापती रमेश पारधी यावेळी उपस्थित होते. स्वयंपाकी महिलांनी पूर्ववत कामावर घेण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. २ आॅक्टोंबर पासून शाळेच्या गेटवरच स्वयंपाकी महिला सुनीता वघारे आणि उषा वाघाडे या दोन महिलांनी आमरण उपोषण सुरू केले होते.
आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रशासनाने दखल घेत प्राचार्य अशोक परिहार आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाºयांना चर्चेत घेण्यात आले. त्या चर्चेत उपोषण कर्त्यांना पाठिंबा देणारे माजी सभापती अब्दुल कलाम शेख, भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल ठवकर, आयटकचे जिल्हा उपाध्यक्ष रामलाल बिसेन, भाजपचे जिल्हा सचिव गजानन निनावे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती रमेश पारधी, शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, गटशिक्षणाधिकारी अर्चना माटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गोसावी, केंद्रप्रमुख अशोक खेताडे, ग्रामसेवक संघाच्या रिता वासनिक, अमर रगडे, प्राचार्य अशोक परीहार यांच्यात समेट घडवून अटी व शर्तीच्या आधारावर तोडगा काढण्यात आला. उपोषणकर्त्या सुनिता वघारे व उषा वाघाडे या दोन्ही महिलांना पूर्वत कामावर घेण्याचे निर्णय घेत निंबू पाणी पाजून आमरण उपोषण मागे घेण्यात आले.