भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शेळ्यांसाठी पाणी आनण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील चिचाळ येथे उघडकीस आली. सलोनी विनोद नखाते (१६) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. सलोनी नखाते ही चिचाळ येथील जिल्हा परिषद विद्यालयात दहाव्या वर्गात शिकत होती. शनिवारी विनोद नखाते हे पत्नी संगीतासोबत बटईने केलेल्या शेळ्या घेऊन गेले होते. तर सलोनी सकाळची शाळा आटोपून आईवडील असलेल्या शेतात गेली. त्यावेळी आईने तिला शेळ्यांसाठी पाणी आनण्यासाठी शेताच्या दुस-या टोकावर असलेल्या विहिरीवर पाठविले. विहिरीतून बादलीने पाणी काढताना पाय घसरून सलोनी विहिरीत पडली. बराच वेळ होऊन मुलगी परत नाही आली म्हणून आईने जाऊन पाहिले असता विहिरीच्या काठावर तिच्या चपल्या दिसल्या. सलोनी ही विहिरीत पडल्याचे लक्षात येताच आईने आरडाओरड केली. आरडाओरड ऐकूण वडील व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह विहिरीबाहेर काढला व उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी अड्याळ पोलिस ठण्यात मर्ग नोंद करण्यात आला आहे.