भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : आत्मनिर्भर भारत निर्माण व्हावा, यासाठी केंद्र शासन धडपड करीत आहे. परंतु तुमसर एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात रिकामे भूखंड पडून आहेत. रिकाम्या भूखंडात पावसाचे पाणी साचून तेथे तलाव निर्माण झाले आहेत. परंतु प्रशासन स्थानिक उद्योजकांना रिकाम्या भूखंडांचे वाटप करीत नाही. यामुळे उद्योजकांमध्ये नाराजी पसरली आहे. तुमसर ते गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथे सुमारे ३० वर्षांपूर्वी एमआयडीसी स्थापन करण्यात आली होती. कुटीर व लघु उद्योग येथे स्थापनव्हावेत, यासाठी उद्योजकांनी भूखंड घेतले. परंतु अनेक उद्योजकांनी येथे उद्योग सुरू केले नाहीत. त्यामुळे देव्हाडी एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात भूखंड अद्याप रिकामे आहेत. पावसाचे पाणी साचून तेथे तलाव झाले आहेत. बाजूचा नाला पावसाळ्यात ओव्हरμलो होऊन त्याचेही पाणी एमआयडीसीच्या रिकाम्या भूखंडात शिरते. पाणी निचरा होण्याची सुविधा नसल्याने पाणी अनेक महिने साचून राहते. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.