भंडारा पत्रिका/वार्ताहर अड्याळ : भंडारा जिल्ह्यातील मौदी ते नागपूर जिल्ह्यातील आंभोरा या दोन गावांना जोडणारा वैनगंगा नदीवरील पुलाचे काम अद्यापही अपुर्ण असल्याने सदरचे पुलावरुन सर्व प्रकारची वाहतुक बंद आहे. महाशिवरात्री निमित्ताने आंभोरा देवस्थान आंभोरा, ता.कुही, जि. नागपुर येथील यात्रेकरीताजाणाºया भंडारा जिल्ह्यातील भाविकांनी अंभोरा गावाजवळील वैनगंगा नदिवरील पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्याने आंभोरा देवस्थान येथे जाण्याकरीता ईतर पर्यायी रस्ते वाहतुकीच्या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन अड्याळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत मिसाळे यांनी केले आहे.
नागपूर व भंडारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा आंभोरा येथील नदीपात्रात नविन पूल बांधकाम होत आहे. पुलाचे बांधकाम अजूनही पूर्ण न झाल्याने पुलावरून कुठल्याही प्रकारची वाहतूक बंद आहे. किमान महाशिवरात्री निमित्ताने आंभोरा देवस्थान येथे वाहतूक सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्याने भंडारा जिल्ह्यातील भाविकांना इतर पर्यायी वाहतूक मार्गाचा वापर करावा लागणार आहे. या आशयाचे पत्र ही अड्याळ पोलीस प्रशासनाने निर्गमित केले आहे.