भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या अथक परिश्रमातून आज बहुजनसमाजाला सन्मान मिळाला. बाबासाहेबांनी कुटुंबाची पर्वा न करता प्रत्येकाला न्याय, हक्क मिळवून दिल्याने बाबासाहेबांच्या उपकाराची परतफेड होऊ शकत नसल्याचे प्रतिपादन दलित साहित्यिक राजू बोरकर यांनी केले. त्रिरत्न बौद्ध विहार कमिटी लाखांदूर येथे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोहात मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोदक रामटेके, प्रकाश नाकतोडे, कोचे गुरुजी, चंद्रशेखर रामटेके, सेवानिवृत्त सैनिक भैसारे, प्रा. उद्धव रंगारी उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना राजू बोरकर पुढे म्हणाले समाजाच्या उत्थानासाठी कार्य करतांना बाबासाहेबांनी स्वत:च्या मुलांचा अंत जवळून पाहिला.
यापेक्षा समाजाचे दु:ख त्यांना मोठे वाटले. त्यांनी आपल्याच दु:खाला मोठे मानले असते तर तुम्हा-आम्हाला सुटबुटात राहता आले नसल्याची आठवण करूनदेत आंबेडकरी राजकारण्यांचा खरपूस समाचार घेऊन बाबासाहेबांचे विचार रुजविण्यासाठी समाजासाठी वेळ काढण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश बडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खुशाल बोरकर, रेखा दहिवले, महादेव सुखदेवे, मंजू गजभिये, शंकर मेश्राम, शारदा लांडगे, चंद्रकला टेम्भूरने, कौशल्या नांदेश्वर, प्रा. अनिल नंदेश्वर, सरिता टेम्भूरने, मोदक रामटेके इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.