भंडारा पत्रिका/वार्ताहर वरठी : भंडारा जिल्ह्यातील प्रमुख अशा भंडारारोड रेल्वे स्थानकावर जाण्याकरिता एकमेव प्रमुख मार्गाची पुर्णत: दुर्दशा झाली आहे. कित्येक महिन्यापासून येथे खड्डे पडले असून दोन दिवस आलेल्या पावसाचे पाणी खड्डयांत मोठया प्रमाणात पाणी साचून आहे. परिणामी येथून ये-जा करणाºया रेल्वे प्रवासी व स्थानिक नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. वरठी येथे भंडारारोड रेल्वेस्थानक असून येथून दररोज शेकडो रेल्वेप्रवासी ये-जा करतात. शहरालगतचे सर्वात महत्वाचे रेल्वेस्थानक असल्याने येथूनच नागपूर व मध्यप्रदेश करिता जाणाºया सर्वाधिक प्रवाशांची वर्दळ असते. मात्र या रेल्वे स्थानकावर जाण्याकरिता एकमेव असलेल्या रस्त्यावर सर्वत्र खड्डे व चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. सदररस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण असल्याने येथे नालीचा सुध्दा अभाव आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पर्यायच नाही. परिणामी सदर पाणी रस्त्यावरील खड्डयांत साचून राहत असून प्रवासी व स्थानिक नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करीत येथून आवागमन करावे लागते. मात्र या गंभीर समस्येकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते आहे. त्यामुळे प्रशासनाने सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेत सदर मार्गाची तात्काळ डागडुजी करणे व मार्गाकिनारी नाली तयार करणे अपेक्षित होते.
जाणीवपूर्वक दुर्लक्ष – सुखानी प्रशासनाच्या वतीने रस्ते वाहतूक व इतर कर नियमानुसार आणि वेळेवर घेतले जाते. मात्र रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेकडे लक्ष देऊन योग्य उपाय योजना करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. याचा त्रास नागरिकांना होतो. त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब या रस्त्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे माजी उपसरपंच मनोज सुखानी यांनी सांगितले.
दारिद्र्यतेचे दर्शन – मेश्राम भंडारा जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्टेशन असल्याने संपुर्ण जिल्हातून नागरिकांना या स्थानकावरुनच प्रवासाकरिता येतात. मात्र राजकारण्यांची उदासीनता व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे वरठीच्या दारिर्द्यतेचे दर्शन संपुर्ण जिल्हावासियांना होत असल्याची प्रतिक्रीया सामाजिक कार्यकर्ते अश्विन मेश्राम यांनी दिली.
आमदारांच्या गृहक्षेत्रात समस्या – रामटेके तुमसर, मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे हे स्थानिक वरठी येथील रहिवासी आहेत. सत्तेत येवून चार वर्ष लोटून देखील अनेक समस्या मार्गी न लागणे अनपेक्षित आहे. नागरिकांच्या आमदारांकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता व्हावी ही अपेक्षा माजी उपसरपंच मिलिंद रामटेके यांनी व्यक्त केली.