भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेल्या घरकुलांना निधी उपलब्ध देण्यात यावा याविषयी एकलव्य सेना महाराष्ट प्रदेश व अखिल ढिवर समाज विकास समिती तालुका लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने खंड विकास अधिकारी लाखनी यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. भटक्या विमुक्त समाजाच्या राहणीमान उंचविण्यासाठी महाराष्ट शासनातर्फे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येते. सदर योजनेमध्ये भंडारा जिल्यातील लाखनी तालुक्यामध्ये ५०० पेक्षा जास्त घरकुल लाभार्थ्यांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. परंतु अद्याप निधीचा वाटप झालेला नाही आहे. या भटक्या समाजबांधवांच्या घरांची परिस्थिती ही पावसाळयामध्ये अतिशय बिकट असते. झोपडीवजा माती, कौलाचे घर असल्यामुळे पावसाळयात पूर्ण घरांमध्ये चिखल व्याप्त असतो. त्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन घरकुल निधीचे वाटप तत्काळ करण्यात यावे अशी मागणी अखिल ढिवर समाज विकास तालुका लाखनीच्या वतीने निवेदनातून करण्यात आली. निवेदन देतेवेळी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विष्णू चाचेरे, अध्यक्ष राजू शिवरकर, उपाध्यक्ष शिवशंकर मांढरे, सचिव चंद्रभान मांढरे, सहसचिव विट्ठल दिघोरे, कोषाध्यक्ष मनिराम नान्हे, समिती सदस्य अतुल कामथे, विनायक कामथे, आशिष दिघोरे, सुहास कामथे, किशोर चाचेरे, अशोक खेडकर, भगवान ठाकरे आदी उपस्थित होते.