चंद्रपूर : जिल्ह्यात शनिवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पाऊसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. नागभीड एमआयडीसी जवळील बामणी पुलावर पाणी चढल्याने नागभीड- उमरेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २५३ वाहतुकीसाठी बंद आहे.पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात शनिवारी रात्री तथा रविवारी पहाटे मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. वैनगंगा, वर्धा, अंधारी, इरई, पैनगंगा तथा अन्य नद्याना पाणी आहे. सर्वाधिक पाऊस हा सावली तालुक्यात १४३.५ मिमी, तर नागभीड तालुक्यात १२३.६ मिमी झाला आहे. सततच्या पावसामुळे या तालुक्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. नागभीड एमआयडीसी जवळील बामणी पुलावर पाणी चढल्याने पहाटे पासुनच हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. नागभीडउमरेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २५३ या मार्गावरील वाहतूक पहाटेपासून बंद आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली आहे. ग्रामीण भागात रस्त्यावर देखील पाणी साचले आहे.