भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पूर येऊ नये म्हणून उपाययोजना केल्या जातात. शहरातील काही वस्त्यांना नेहमीच पुराचा धोका सतावीत असतो. अशावेळी पाणी गावात शिरू नये म्हणून संरक्षण भिंत तयार केली गेली. मात्र याच भिंतीला काम करण्याच्या नावाखाली पाडलेले भगदाड पुराच्या पाण्याला आयता मार्ग मोकळा करून देणारे ठरण्याची भीती आहे. या घडीला पूर आल्यास भंडारा शहरातील सिंधी कॉलनी आणि टाकळी परिसरात हाहाकार माजविण्याचे काम हे भगदाड करणार आहे, हे नक्की.
भंडारा शहराच्या शेजारून वाहणा-या वैनगंगा नदीवर गोसीखुर्द येथे झालेल्या धरणानंतर शहराला अनेकदा पूर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. पुराचे पाणी भंडारा शहरात शिरू नये म्हणून शहराला संरक्षण भिंत तयार केली गेली. केवळ भिंतच तयार केली गेली नाही तर शहरातील पावसाचे साठणारे पाणी नदीत सोडण्याच्या हेतूने संरक्षण भिंतीच्या लागून पंपहाऊस तयार करण्याचे नियोजन झाले. गोसीखुर्द प्रशासनाचे हे काम मागील अनेक वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. अशावेळी पुराच्या पाण्याचा लोंढ आल्यास त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कुठलीही व्यवस्था प्रशासनाकडून केल्याचे दिसत नाही. लोकप्रतिनिधी आणि अधिका-यांनी या विषयाकडे गांभीयार्ने पाहून धोका होण्याआधीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.