भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयांत आता नागरिकांना मोफत उपचार देण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे वृत्त आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील गरीब, गरजू, रुग्णांना मिळाला मोठा दिलासा मिळणार आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम २१ नुसार ‘राईट टू हेल्थ’ चा नागरिकांना अधिकार अंतर्गत सदर सेवा राज्यातील जनतेने मिळावी या उद्देशाने राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि त्यांच्या या प्रयत्नाला आज अखेर यश आले. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल : नाशिक आणि अमरावती), कॅन्सर हॉस्पिटलसह राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण २,४१८ संस्थांमध्ये मोफत उपचार मिळणार आहेत. सध्या या सर्व रुग्णालयात वर्षभरात उपचार घेण्यासाठी सुमारे २.५५ कोटी नागरिक येतात. आता या सर्व ठिकाणी रुग्णांना नि:शुल्क उपचार मिळणार आहेत.