भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जळगाव : राज्यात जवळपास संपूर्ण आॅगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. मराठवाड्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण होताना दिसत आहे. आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर, काही भागात कृत्रिम पावसाचा पर्याय पडताळून पाहावा लागेल, असे स्पष्ट संकेत पाणीपुरवठा आणि जलसंधारण मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. राज्याच्या अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत असून, अनेक पिकांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पडण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. पोषक वातावरण असल्यावर कृत्रिम पावसाबाबत शास्त्रज्ञांशी चर्चा सुरू असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. जळगाव जिल्ह्यात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी टँकरही सुरू करण्यात आले आहेत तर, भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता विहिरी अधिकृत करण्यासह विविध उपाययोजना सुद्धा करण्यात येत आहे.