भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भारतीय सीमेवर डोळ्यात तेल घालून जनतेचे संरक्षण करण्यासाठी सदैव तैनात असलेल्या आम्हा सैनिकांना “धागा शौर्य का राखी अभिमान की” या उपक्रमातंर्गत गेल्या आठ वर्षापासून विविध शाळा, विद्यालय व महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी स्वत: राख्या तयार करत पत्र रूपी संदेश व राख्या पाठविण्याचा अभिनव उपक्रम सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर यांच्या संकल्पनेतून पंजाब, जम्मू काश्मीर व २०६ कोब्रा बटालियनच्या सैनिकांना राख्या बांधून सामाजिक बांधिलकी जोपासत आमचा सैनिकांचा मनोबल, आत्मविश्वास वाढविला आहे. त्याकरिता देशाच्या संरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असे प्रतिपादन २०६ कोब्रा बटालियनचे व्दितीय कमान अधिकारी इथापे पंडित किसनराव यांनी केले. ते भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कोब्रा बटालियन २०६ चितापुर येथे रक्षाबंधना निमित्ताने राखी व संदेश पत्राला उत्तर देतांना बोलत होते.
२०६ कोब्रा बटालियनचे (पीएमजी) कमांडंट श्री. लवकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी २०६ कोब्रा बटालियनचे व्दितीय कमान अधिकारी इथापे पंडित किसनराव होते. त्यावेळी डीसी विशाल विग, डीसी रणजित मंडल, एसी. एस. आर. शुभाकर, एसी आशुतोष पंडये, संस्कार चळवळचे प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा चटप, महा सेतू केंद्राचे संचालक समीर नवाज, जे. एम. पटेल महाविद्यालयाची विद्यार्थीनी तथा नँशनल खेळाडू प्राची चटप उपस्थित होते. यावेळी जे. एम. पटेल महाविद्यालयाची विद्यार्थीनी तथा नँशनल खेळाडू प्राची चटप व सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा चटप यांनी सैनिकांना राखी बांधून औक्षवंत केले. रक्षाबंधन प्रसंगी जे. एम. पटेल महाविद्यालय, महिला अध्यापक विद्यालय व नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, जिजामाता विद्यालयातील अनेक विद्याथीनींनी सैनिकांना लिहलेल्या संदेशाचे वाचन डीसी विशाल विग यांनी केले. त्यावेळी राखी बांधत व संदेश वाचन करतांना अनेक सैनिकांचे डोळे पाणावले होते.
“धागा शौर्य का, राखी अभिमान की” या उपक्रमाअंतर्गत गेल्या आठ वर्षापासुन जे. एम. पटेल महाविद्यालय, महिला अध्यापक विद्यालय व नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, जिजामाता विद्यालयातील अनेक विद्याथीनींनी स्वत: राख्या तयार करत पत्र रूपी संदेश पाठविण्याचा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते केजरकर यांच्या संकल्पनेतून राबवित २०६ कोब्रा बटालियनच्या सैनिकांना राख्या बांधून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोब्रा बटालियन २०६ चितापुर येथे निमित्ताने चार विद्यालयातील विद्यार्थीनींनी स्वत: राखी व संदेश पत्र तयार केलेला बॉक्स विलास केजरकर यांनी २०६ कोब्रा बटालियनचे कमांडंट व्दितीय कमान अधिकारी श्री ईथापे पंडित किसनराव यांना सुपुर्द केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालय, नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, जिजामाता विद्यालय, महिला अध्यापक महाविद्यालय, जिजामाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्याथीर्नींनी व शिक्षकेत्तर कर्मचारी, कोब्रा बटालियनच्या अधिकारी, कर्मचारी तसेच सैनिकांनी सहकार्य केले.