भंडारा : भंडारा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग , कृषी विभाग यासह विविध विभागा अंतर्गत मोठया प्रमाणात गैरप्रकार होत असुन त्याला पालकमंत्र्यांनी वेळीच आळा घालावा अन्यथा संबंधीत विभागा विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते माजी आमदार चरण वाघमारे यांनी आज भंडारा येथे पत्रपरिषदेत दिला . जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जवळपास दिडशे कोटीच्या रस्त्याची कामे मंजुर करण्यात आली असुन ती कामे निविदा प्रक्रियेत आहेत. असे असताना निविदा प्रक्रियेत काही राजकीय सत्ताधारी पक्षाच्या नेत्या कडून कंत्राटदारावर दबाव टाकून सदर कामात रिंग बनवून स्पर्धा करू नका अन्यथा पाहून घेऊ असा इशारा देण्यात आल्याची माहिती आहे. शासकीय दरापेक्षा कमी किंमतीत कामेव्हावे याकरीता शासनामार्फत ई- निविदा प्रक्रिया राबवली जाते. कंत्राटदारावर दबाव आणले जात असुन या संदर्भात आपण मुख्य अभियंता सा.बां.विभाग नागपूर तसेच, कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग भंडारा यांना लेखी स्वरूपात तक्रारी केल्याचेही वाघमारे यांनी यावेळी सांगीतले.
कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असुन मानव विकास योजनेतुन जिल्ह्यातील तुमसर,मोहाडी, लाखनी, साकोली आणि लाखांदूर तालुक्यातील शेतकरी गट कंपनीला ट्रॅक्टर ,रोटावेटर व इतर यंत्रसामुग्री करिता लाभार्थी निवडीपासून साहित्य वाटपाच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून कोणत्याही वृत्तपत्रात जाहिरात न देता, कोणतीही निविदा न काढता, वेळेवर शेतकरी गट स्थापन करून आपल्या मजीर्तील लोकांना ट्रॅक्टर व इतर सामग्री वाटपाचे कामकेल्याचे व सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच सदर निविदा काही विशिष्ट डीलरला देऊन जास्त किमती दाखवून, तुलनेने कमी साहित्याची खरेदी करून रेकॉर्डवर जास्त संख्या दाखवीत पेमेंट शेतकरी गटाला न करता पुरवठा धारकाला करणे. लाभार्थी हिस्सा जास्त घेणे. एका सत्ता पक्षाच्या राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपामुळे लाभार्थी निवड करताना नियमानुसार लाभार्थी निवड न करता, नियमानुसार साहित्य खरेदी न करता, शासनाचे मानव विकास योजना अंतर्गत जवळपास २५ कोटी रुपयांचा गैरप्रकार करण्यात आला.या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कारवाई, नियमानुसार लाभार्थी यादी केली काय ? नियमानुसार साहित्य खरेदी केले काय ? कुठल्या पुरवठा धारकाला कंत्राट दिले साहित्य खरेदी आणि वाटपात शासनाचे मार्गदर्शक सूचनाचे पालन केले काय ?
याबाबतची सविस्तर चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी आपण प्रकल्प संचालक आत्मा यांना केली आहे. वरील सर्व नियमबाह्य प्रक्रिया हि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा यांच्याकडे प्रकल्प संचालक आत्मा यांच्या अतिरिक्त कार्यभार असताना झाल्याचेही चरण वाघमारे यांनी यावेळी सांगीतले. याप्रमाणेच जिल्ह्यात वन विभाग , पाटबंधारे विभाग तसेच नगर प रिषदेच्या कामात सुद्धा ई-निविदा प्रक्रियेत राजकीय दबावाचा वापर करून गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक निविदा प्रक्रियेत मर्जीतल्या कंत्राटदाराला कामे मिळावीत म्हणून त्यांच्या सोयीनुसार निविदा प्रक्रियेत अटी घालून नियमबाह्य निविदा काढल्या असल्याचे दिसुन येत असल्याचे वाघमारे यांवेळी म्हणाले. या सर्व प्रकरणातुन पालकमंत्र्यांनी भंडारा जिल्ह्याला वाºयावर सोडल्याचे स्पष्ट होत असुनजिल्ह्याचा कारभार चेल्याचपाट्यांच्या हातात अधिकार दिल्याने जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी त्यांचे बाहुले बनून काम करीत आहेत.प्रमुख सनदी अधिकारी कायदे बाजूला ठेवून काम करीत असल्याने जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था विस्कटली आहे. करीता जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात लक्ष घालुन शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्व व जीआरच्या आधारे निविदा प्रकिया राबवून बांधकाम विभाग ,कृषी विभाग, पाटबंधारे ,वन विभाग ,तसेच नगरपरिषदेतील निविदा प्रक्रियेत होणार गैरप्रकार न थांबविल्यास संबंधीत विभागाच्या कार्यालयात बीआरएस तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार चरण वाघमारे यांनी यावेळी दिला. पत्रकार परिषदेला बीआ- रएस नेते धनंजय मोहरकर,प्रकाश महालगावे, अरविंद भालाधरे आदि उपस्थित होते.