भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : मराठा आरक्षणाच्या निमित्ताने ओबीसी आरक्षणावर अतिक्रमण केल्या जात आहे. ओबीसी समाजाला कमी आरक्षण असताना पुन्हा मराठा आरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेले अतिक्रमणाच्या विरोधात लोकजागर अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती अभियानाचे अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांनी दिली. ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे,यासाठी येत्या २ डिसेंबर रोजी दुपारी १ वा. गुरूदेव सेवा मंडळ आश्रम, आग्याराम देवी चौक, येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. मराठा समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी. महाराष्ट्रात २१ वेळा मराठा समाजाच्या लोकांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यात एकही मुख्यमंत्री कुणबी का नाही? म्हणजे सत्ता वाटपाच्या वेळी मराठा आणि कुणबी एक नसतात का? असा प्रश्न वाकुडकर यांनी केला. ओबीसी हा आरक्षणाचा नैसर्गिक हकदार आहेत. त्यांना त्यांच्या संख्येएवढे आरक्षण मिळालेच पाहिजे. आंदोलनाच्या आडून जाळपोळ करणाºया, दहशत पसरविणाºया समाजकंटकावर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी अशोक यावले, बळवंत भोयर आदी उपस्थित होते.