भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : धान बांधणीनंतर शेतातील शिल्लक लोंबी वेचण्यासाठी जाणाºया महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. ही घटना शुक्रवार २४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास हिरापूर येथील कंपार्टमेंट नं. १६६ मधील शेतशिवारात घडली. इंदिराबाई उमाजी खेडेकर (५५)रा. हिरापूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. इंदिराबाई खेडेकर या आपल्या शेतातील धानाच्या लोंबी (सरवा) वेचण्यासाठी पाथरगोटा भागातील शेतात हिरापूर-शिवणी मार्गाने जात होत्या. परंतु याच वेळी रस्त्यालगतच्या झुडपात दबाधरून बसलेल्या वाघाने इंदिराबाईवर हल्ला करून त्यांना झुडपात फरफटत नेले. सायंकाळ होऊनही इंदिराबाई घरी परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी शेताच्या दिशेने धाव घेतली व शोध सुरू केला. तेव्हा सायंकाळी सात वाजताच्या सुमारास इंदिराबाई यांचा मृतदेह पाथरगोट्याजवळ आढळला. त्यानंतर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनाधिकारी व कर्मचाºयांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व इंदिराबाईंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंड आहेत.