भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : दिवाळी संपता बारा दिवसा नंतर तुळशी विवाहाचे वेध लागतात. कार्तिकी शुक्ल एकादशीपासून तुळशी विवाह प्रारंभ होतो. तुळशी विवाहाच्या पार्श्वभूमीवर घराघरातील वृंदावनाची साफसफाई व रंगरंगोटी करण्यात येते. यंदा शुक्रवार २४ नोव्हेंबर पासून तुळशी विवाह सोहळ्यांना प्रारंभ झाला आहे, यासाठी लागणाºया साहित्य खरेदीसाठी महिला पुरुष वर्गांची बाजारात लगबग सुरू झाली आहे. तुळशी विवाह असल्याने सध्या गोंदिया शहरातील बाजारपेठेमध्ये तुळशी विवाहसाठी लागणारे साहित्य विक्रीस दाखल झाले आहे. ऊस, चिंचेची फांदी, आवळ्याची फांदी, आंब्याच्या टाळ व हरभºयाच्या भाजी, बोर विक्रीस दाखल झाले असून बहुतांश शेतकरी ऊस आपापल्या शेतातून आणून ठिकठिकाणी रस्त्यावर ऊसाचे दांडे विकत आहेत. तुळशी विवाह निमित्त तुळशीची नवनवीन रोपे ही विकत घेतली जातात घरोघरी चुन्याची रांगोळी काढली जाते तुळशीची रोपे नवीन लाल मातीत घालून त्यांची रंगरंगोटी केली जाते.
दारामध्ये तोरणे पता व फुलांनी सजावट केली जाते घरातील एक मुलगी समजूनच तुळशीला सजविण्यात येते. तुळशी विवाहासाठी ऊसाचा व केळीच्या पानाचा मंडप तयार केला जातो. विवाह संपन्न झाल्यानंतर फटाक्याची आतषबाजी केली जाते. त्यानंतर सर्वांनाप्रसाद म्हणून दिवाळी फराळ ,उसाचे तुकडे, साखर तीळ व मुरमुरे असे पदार्थ वाटले जातात. तुळशी विवाहाला मोठी दिवाळी म्हणून संबोधले जाते. दसरा दिवाळी उत्सव साजरा झाल्यानंतर तुळशी विवाह उत्सवाची लगबग सुरू होते. दिवाळीच्या बाराव्या दिवशी साजरी केली जाते.एक आठवडा पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. दिवाळीसाठी घरासमोर लावलेले आकाशदीप, विजेची रोषणाई, नित्य रात्री पणत्यांची केली जाणारी आरास ही तुळशीच्या लग्नापर्यंत चालू ठेवलेली असते.