भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली: सानगडी-सासरा-मिरेगाव या तीन गाव दरम्यान असलेल्या चुलबंद नदीवर पुल नसल्याने या परिसरातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. परंतु येथील चुलबंद नदीवर पुलाचे बांधकाम जलद गतीने सुरु असल्यामुळे लवकरच हे पुल रहदारीसाठी सुरु होणार आहे. शासनाच्या अर्थसंकल्प बजेट मधून एकूण १६ कोटी रुपये मंजुरी मिळालेल्या या पुलाचे वर्क आॅर्डर ७ जून २०२२ रोजी निघाले. तर या पुलाचे बांधकाम ६ मे २०२४ रोजी पूर्ण करणे आहे. जवळपास १८० मिटर लांब या पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग साकोली यांच्या कार्यकुशल देखरेखीखाली आज रोजी ८० टक्के पूर्ण झाले असून वर्क आॅर्डरच्या ठरलेल्या तारखेनुसार बांधकाम पूर्ण होण्याचे चित्र आहे. सदर पुलाचे बांधकाम करतांना नदी पात्रात एकूण १७ पिल्लर उभारण्यात आलेत. यातील १२ पिल्लरवरील स्लॅब पूर्ण झाले आहे. तर उरलेल्या ५ पिल्लर वरील स्लॅबचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
या पुलाची क्वालिटी योग्य होऊन ते मजबूतपणे लोकांना रहादारीसाठीलवकर मोकळा व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी मटाले आणि अभियंता झाडे हे बारीक लक्ष ठेऊन आहेत. सानगडी पोलीस चौकी अंतर्गत नदी पलीकडे असलेले मिरेगाव व सोनमाळा हे दोन गावे कार्य क्षेत्रात येतात. येथे कुठलीही घटना घडली तर पावसाळ्यात नदीला पूर व भरपूर पाणी राहत असल्याने पोलिसांना विहीरगाव बुराड्या मार्गे ९ किमी अंतर तर साकोली मार्गे २५ किमी अंतर जावे लागत होते. मात्र या पुलामुळे आता केवळ ६ किमी अंतर पार करून लवकर पोहचता येईल. या पुलाने आता लाखनी, भंडारा, पालांदूर, अड्याळ, पवनी येथे लवकर जाण्यास मदतहोणार आहे. तसेच शेतकºयांना आपले शेती उत्पादन माल बाजारात लवकर पोहचविण्यात सोयीचे होणार आहे.