भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पत्रकारितेमधील विश्वासार्हतेवर कायम प्रश्नचिन्ह उभे केले जाते. मात्र, ही विश्वासार्हता आपण खरोखरच गमावली का? याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. नकारात्मक मानसिकतेमधून बाहेर पडा. सकारात्मक व आशावादी ध्येयाने पत्रकारिता करा व इतरांपेक्षा काही वेगळे करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन ज्येष्ठ संपादक बाळसाहेब कुळकर्णी यांनी केले. व्हॉईस आॅफ मीडिया भंडारा शाखेतर्फे आयोजित पत्रकार अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. भंडारा येथील सामाजिक न्याय भवन सभागृहात दि. २० फेब्रुवारी रोजी मंगळवारी हा दिमाखदार सोहळा अत्यंत थाटात आणि उत्साहात पार पडला. या अधिवेशन व पत्रकारिता पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक बाळसाहेब कुळकर्णी होते. प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे, डिजीटल तरूण भारतचे संपादक शैलेश पांडे, प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलिस अधिक्षक लोहित मतानी, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे, व्हॉईस आॅफ मीडियाचे मंगेश खाटिक, स्वागताध्यक्ष जैकी रावलानी, नंदकिशोर परसावार मंचावर होते. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांचे सन्मानचिन्ह व शाल देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी स्वागताध्यक्ष जॅकी रावलानीम्हणाले, भंडारा जिल्ह्यात पत्रकारांचे अशाप्रकारचे प्रथमच अधिवेशन आयोजित केल्याबद्दल कौतुक करून पत्रकारांसाठी शासकीय पातळीवर योजना राबविण्याची गरज व्यक्त केली. यावेळी बाळ कुळकर्णी म्हणाले, ग्रामीण पत्रकरिता ही खूप आव्हानात्मक असून त्यावरच लोकशाही टिकून आहे. सोशल मीडियाच्या काळात मूळ पत्रकारितेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, आत्मचिंतन करावे. बातम्यांचे विषय आणि स्वरूप बदलले आहे. त्यामुळे चांगले वाचन करा, चिंतन करा, कोणत्या प्रांतात जायचे आहे हे आधी ठरवून घ्या. इतरांपेक्षा वेगळे करण्याचा प्रयत्न जोवर तुम्ही करणार नाहीत, तोपर्यंत समाज तुम्हाला सलाम करणार नाही. खासदार सुनील मेंढे म्हणाले, पत्रकार हे खºया अर्थाने समाजाला जागृत करतात. अन्यायाला वाचा फोडून सत्य समोर आणतात. परंतु, त्यांचे भवितव्य असुरक्षित आहे. पत्रकारांनी चांगल्या बाबींची दखल घ्यावी, असे आवाहन केले. भंडारा जिल्ह्यात पत्रकारांचे अधिवेशन होत असल्यामुळे ग्रामीण पत्रकारांसह शहरी पत्रकारांमध्ये उत्सुक्ता होती. या अधिवेशनाला भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यातील पत्रकारांनी हजेरी लावून उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. यावेळीगोपालकृष्ण मांडवकर, विजय निचकवडे, शमशेर खान, काशिनाथ ढोमणे नदीम खान, उदय राऊत, दीपेंद्र गोस्वामी, चंद्रकांत श्रीकोंडवार, नेहाल भुरे, दीपक फुलबांधे, विलास सुदामे प्रविण तांडेकर, शुभम देशमुख, युवराज गोमासे, तालुका अध्यक्ष महादेव शिवरकर, सागर बागडे, राजू बांते, अमित रंगारी, कल्याण राऊत, आशिष साखरे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.