
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : साकोली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या एकच चर्चा आहे. ‘बिबट्या आला रे आला’, जंगलात क्वचितच दिसणारा बिबट्या आता थेट गाववस्ती, शेतशिवार आणि ऊसाच्या फडात वारंवार आढळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र होत असताना वन्यजीव विभागाची भूमिका संशयाच्या भोवºयात सापडली आहे. जंगलतोड, अतिक्रमण, अपुºया उपाययोजना आणि निर्णयक्षमतेचा अभाव यामुळे हा संघर्ष अधिकच पेटत चालल्याचे चित्र आहे.
घनदाट जंगल असतानाही दुर्मीळ असलेला बिबट्या आज अचानक गावोगाव का दिसू लागला, यावर कोणतेही ठोस संशोधन वा अभ्यास होताना दिसत नाही. जंगलातील अधिवास नष्ट झाल्याने आणि नैसर्गिक शिकार कमी झाल्याने हा चपळ व हुशार शिकारी प्राणी मानवी वस्तीकडे सरकत असल्याचे वास्तव आहे. मात्र एखाद्या गावात बिबट्या दिसल्याची बातमी मिळताच वन्यजीव विभागाकडून ‘फटाके फोडा, रात्रभर जागा राहा’ एवढ्याच सूचना दिल्या जातात. दिवसभर श्रम करून थकलेल्या ग्रामस्थांनी रात्रभर जागून जीव मुठीत धरायचा का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.