
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदुर : कष्टाची तयारी आणि कलेची जिद्द असेल, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश कसं मिळवता येतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे लाखांदुर तालुक्यातील पारडी येथील दुधराम कावळे. कधीकाळी उपजीविकेसाठी सलूनमध्ये काम करणारा हा तरुण आज आपल्या अस्सल अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला खदखदून हसवत असून, प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
दुधराम यांच्या अभिनयातील जादू इतकी जबरदस्त आहे की, आज ज्या गावात त्यांचे नाटक असते, तिथे त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी उसळते. विशेष म्हणजे, त्यांच्याअभिनयामुळे ‘धनंजय स्मृती रंगभूमी’च्या नाटकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. दुधराम यांच्या जोडीने या रंगभूमीने आतापर्यंत तब्बल १५० च्या आसपास यशस्वी प्रयोग पूर्ण केले असून, प्रत्येक प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ होत आहे.
महाराष्ट्र शासनाकडून विशेष गौरव
आपल्या कलेच्या जोरावरदुधराम कावळे यांनी केवळ ग्रामीण भागातच नव्हे, तर राज्यस्तरावरही आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच असामान्य कामगिरीची दखल घेत नुकताच मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. या सन्मानाने त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
संघर्षाची एक प्रेरणादायी गाथा
कधी काळी नाटकाला जाताना पिशवीत कपडे नेणारा हा कलाकारआज राज्याच्या कानाकोप?्यात सत्कार स्वीकारत आहे. त्यांच्या अभिनयातील सहजता आणि कॉमेडीची सोशल मीडियावरील चर्चा पाहता, त्यांचे करिअर आता यशाच्या शिखरावर असल्याचे दिसते. सलूनच्या छोट्या दुकानापासून सुरू झालेला हा प्रवास आज राज्य स्तरावरील पुरस्कारापर्यंत पोहोचला आहे, जो आजच्या तरुण कलावंतांसाठी एक मोठी प्रेरणा ठरला आहे.