
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि संविधान लागू झाल्यापासून केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त-भटक्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी वर्ग पहिलीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत आणि परदेशी शिक्षणासाठीही विविध शिष्यवृत्ती व शैक्षणिक योजना उपलब्ध आहेत. मात्र या योजनांची माहिती ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचत नसल्याचे वास्तव आजही दिसून येते. याच पार्श्वभूमीवर “शिकायला पैसे लागत नाहीत” हा संदेश घेऊन नेचर फाउंडेशन, नागपूरतर्फे विदर्भात शिक्षण जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
“केजी टू पीजी, लोकल टू ग्लोबल” या संकल्पनेवर आधारित ही शिक्षण यात्रा गेल्या दोन वर्षांपासून वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू आहे. संस्थेच्या माहितीनुसार, आतापर्यंत ५५ हून अधिक गावांमध्ये समाजमंदिर, शाळा, अभ्यासिका, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधण्यात आला आहे. शासकीय निवासी शाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, नवोदय विद्यालय, एनएमएमएस परीक्षा, विविध शिष्यवृत्ती योजना, सीयूईटी, आयआयटी, नामांकित केंद्रीय व खाजगी विद्यापीठांमधील प्रवेश प्रक्रिया तसेच परदेशी शिक्षणासाठी उपलब्ध संधी याबाबत माहिती देण्यात येत आहे. संस्थेचे संस्थापक निलेश नन्नावरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली.