भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पावसाळ्यात नदी नाले दुथडी भरुन वाहु लागले की वाहनी गावामध्ये एखाद्याची अंत्ययात्रा काढण्यासाठी देखील कमालीची कसरत करावी लागते. वाहणी येथील रहिवासी रमेश वासनिक यांचा मृत्यू झाला. ही ग्रामस्थांसाठी खूप दु:खाची बाब ठरली. त्यांचा अत्यंविधीचा कार्यक्रम आटोपण्यासाठी स्मशानभुमीपर्यंतचा प्रवास देखील नागरिकांना नाल्यातून करावा लागला. या नाल्यावर पूल बांधण्याची मागणी येथील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करत आहेत. परंतू स्थानिक प्रशासनाच्या उदासीन धोरणांमुळे याकडे दुर्लक्ष होत आहे. वारंवार मागणी करून सुद्धा नागरिकांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने आज पुन्हा रमेश वासनिक यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत जाताना नागरिकांना भर पाण्यातून जावे लागले. त्यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त केला. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणाचा निषेध व्यक्त करत स्थानिक रहिवासी नागरिकांनी स्मशानभूमीकडे जाण्याकरिता पूल बांधण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.