भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- विना रॉयल्टी रेती वाहतूक करतांना २ टिप्पर मिळून आल्याने चालक मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचेकडून ४५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजेंद्र ताराचंद झिंगरे (४२), शेरसिंग दसाराम चव्हाण(४३), आकाश घनश्याम चौधरी (२३) सर्व राहणार सावरबंध, तालुका साकोली आणि पंकज चांददेव कापगते(३२) रा. पिंडकेपार, तालुका साकोली अशी आरोपींची नावे आहेत. राष्ट्रीय महामार्गाने अवैध रेती वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहिती वरून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार गौरीशंकर कडव आणि पोलिस नायक पियूष बाच्छिल यांचे पथकाने लाखनी उड्डाण पुलावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत असताना पिवळ्या रंगाचा टिप्पर क्रमांक एमएच ४० एके ६५५० मध्ये ५ ब्रास आणि आकाशी रंगाचा टिप्पर क्रमांक एमएच ३१ एफसी ५३८१ मध्ये ५ ब्रास विना परवाना रेती भरून वाहतूक करतांना आढळून आल्याने जप्त करून पोलिस स्टेशन ला लावून ४५ लाख ३० हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक २२३/२०२२ कलम ३७९, ३४ भादवि अन्वये दोन्ही टिप्पर चे चालक आणि मालक यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपासपोलिस हवालदार गौरीशंकर कडव करीत आहेत.