भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : महावितरण गोंदिया परिमंडलाच्या नव्या मुख्य अभियंता श्रीमती पुष्पा राम चव्हाण यांनी आपल्या पदाचा कार्यभार मुख्य अभियंता म्हणुन आज स्वीकारला. ऊर्जा हे विकासाचे मुळ स्त्रोत असल्याने परिमंडलाअंतर्गत असलेल्या समाजाच्या शेवटच्या घटकांना गतीमान सेवा व ऊर्जेव्दारे विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे, वीज चोरी, वीज गळतीला आळा घालणे, अखंडित, पारदर्शक आणि गतीमान सेवा देण्यावर भर राहणार असल्याचे मत पुष्पा चव्हाण यांनी व्यक्त केले. तसेच ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल वेळेत भरणे तेवढेच गरजेचे असल्याचेही मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. पुष्पा चव्हाण यांची महावितरणच्या पहिल्या महिला मुख्य अभियंता म्हणून मुख्य अभियंता (वितरण) या पदावर २०१५ साली नियुक्ती झाली. त्यानंतर मुख्य अभियंता (एकात्मिक ऊर्जा विकास योजना), मुख्य अभियंता भांडूप परिमंडलाची व अमरावती परिमंडळा ची जबाबदारी अत्यंत कुशलतेने आणि यशस्वीरित्या पार पाडली. भांडुप परिमंडळात मुख्य अभियंतापदी कार्यरत असताना जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी बेटास समुद्राच्या तळाशी १.२ मिटर खालून ७ किमी लांबीची २२ केव्हीची ऊच्चदाब केबल टाकून वीज पुरवठा करण्यात आला. या कामाची जबाबदारी मुख्य अभियंता श्रीमती पुष्पा चव्हाण यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली.
घारापुरी बेट प्रकाशमान झाल्याची नोंद ना.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वेळा मन की बात मध्ये घेतली होती. तसेच जुन २०२० मध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळात महावितरणच्या विज वाहिन्या जमीनदोस्त झाल्या असतांना अत्यंत कमी कालावधीत नियोजनबध्द पध्दतीने सर्व यंत्रणा पुर्ववत करण्याची महत्वाची आणि कठिण जबाबदारी त्यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या विविध कार्याची दखल घेत महावितरण मुख्य कार्यालयांकडून त्यांची प्रकाशगड येथे मुख्य अभियंता (सौर प्रकल्प), त्यानंतर मुख्य अभियंता (कृषी धोरण) या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. याच काळात शेतकºयांना वीजबिलाच्या थकबाकीतून कायमचे मुक्त करणारे कृषी वीज जोडणी धोरण २०२० अस्तित्वात येऊन धोरणाची अंमलबजावणीसाठी ‘कृषी पर्व’ राबविण्यात आले. तत्कालीन एमएसईबी आणि आता महावितरणसारख्या महत्वाच्या आणि राज्यव्यापी वीज कंपनीमध्ये काम करतांना पुष्पा चव्हाण यांनी एक स्त्री म्हणून कुठेही मर्यादा पडू न देता कनिष्ठ अभियंता ते मुख्य अभियंता अशा विविध पदाच्या जबाबदाºया धडाडीने आणि खंबीरपणे पार पाडल्या आहे. १९८९ मध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर रूजू झालेल्या पुष्पा चव्हाण यांच्या पाठीशी ३२ वर्षाच्या कामाचा प्रदिर्घ अनुभव आहे. प्रत्येकाची कामाप्रती असलेली प्रामाणिकता, चिकाटी आणि कामात सातत्य असल्यास यश हे निश्चित असल्याचे मत पदभार स्वीकारतांना त्यांनी व्यक्त केले.