भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जगाला युद्ध नाही तर फक्त बुद्धांचे विचारच तारू शकतात, आज जग बॉम्ब गोल्याच्या ढिगा-यावर उभे आहे. जरा कुठे ठिणगी लागली अन् जग संपूर्ण जळून खाक झाले, अशी घातक अवस्था आपल्या पृथ्वीची झालेली आहे. मानवाच्या अस्तित्वाचा प्रश्न जणू आवासून उभा असल्याचे आपल्याला दिसत आहे. मागील चौदा महिण्यापासून रशिया आणि यूक्रेनचे युद्ध सतत चालू आहे, या युद्धात लाखो सैनिक, स्त्रीया, पुरुष आणि अनेक बालकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. लाखो लोकांचा बळी घेऊन सुद्धा दोन्ही देशाचे शासक कुठे ही थांबायला तयार नाहीत. एकीकडे गौतम बुद्धांनी नदीच्या पाण्याच्या वापराच्या अधिकारावरुन युद्धाच्या उंबरठ्याशी आलेले शाक्य व कोलियांनायुद्ध करण्यापासुन परावृत्त केले.
त्यासाठी बुद्धांनी स्वत: घराचा त्याग केला व हजारो लोकांना जीवनदान दिले. इतके भक्कम उदाहरण असतांना देखील रशिया आणि यूक्रेन हे दोन्ही देश बुद्धांचा मार्ग स्वीकारत नाही आणि याच देशांनी जगाला अणुयुद्ध तसेच तिस-या महायुद्धाच्या स्थितीत आणले आहे. या युद्धाच्या परिणामाचा जरा अभ्यास करून बुद्धांच्या शांती अहिंसा, प्रेम, मानवता मार्गाचा अवलंब करावा याशिवाय काही तरणोपाय नाही, असे विचार बुद्ध जयंती च्या कार्यक्रमात समितीचे सचिव एम. आर. राउत यांनी व्यक्त केले. भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिति तर्फे आज ५ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वावर भगवान गौतम बुद्धांची २५५६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी भगवान बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची दिप, धूप, पुष्प द्वारे पूजा करण्यात आली. बुद्धवंदनेनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला असित बागडे, यशवंत नंदेश्वर, सूर्यभान हुमने, युवराज कोचे, राजेन्द्र काळे, रमेश जांगडे, भीमराव बंसोड, माधवी बंसोड, नैना बागडे तसेच भंडारा शहरातील गणमान्य व्यक्तिंची उपस्थिती होती.