भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : अपंगांना सन्मानाने वागणूक मिळावी म्हणून त्यांना दिव्यांग संबोधण्यात यावे इतक्या छोट्याशा पण तेवढ्याच सकारात्मक विचारातून दिव्यांग कल्याणासाठी झटणारे केंद्र सरकार आज दिव्यांगांचा आधार बनले आहे. दिव्यांगांना सहाय्यक ठरणा-या साहित्य वाटपाची योजना दिव्यांगांना स्वत:च्या पायावर उभी करणारी असल्याचे मत खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले. खासदार सुनील मेंढे यांच्या प्रयत्नातून भारत सरकारच्या सामाजिक न्याय व एआयडीपी विभागांतर्गत दिव्यांगांना मोफत साहित्य देण्याच्या दृष्टीने नोंदणशिबिर आयोजित करण्यात आले होते. लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांसाठी साहित्य वाटप शिबिर घेतले जात आहे. नुकतेच वात्सल्य सभागृह, अजुर्नी मोरगाव येथे १९२ लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी बोलतांना खा.मेंढे म्हणाले की, केंद्र सरकार ग्राम विकासाच्या दृष्टीने सकारात्मक आहे. गावापासूनच देशाचा विकास अभिप्रेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातपरिवर्तन आणलेले आहे. अपंग व्यक्तींनाही सक्षम होउन मानाने जगता यावे यासाठी साहित्य वाटपाची योजना अत्यंत उपयुक्त असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. साहित्य न मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत साहित्य पोहोचवून देईपर्यंत पाठपुरावा करेल असा विश्वासही त्यांनी दिला. याप्रसंगी माजी मंत्रीराजकुमार बडोले , रचनाताई गहाने जि.प.सदस्य, जयश्रीताई देशमुख जि.प.सदस्य, उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी , तहसीलदार बागडे, गट विकास अधिकारी निमजे , गजानन डोंगरवार, भोजू लोगडे सरपंच संघटना अध्यक्ष, तहसील कार्यालय चे सर्व कर्मचारी, नगर पंचायत चे कर्मचारी, पंचायत समिती चे कर्मचारी व समस्त नागरिक उपस्थित होते..