भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मागिल काही वर्षापासून भंडारा ते वरठी मार्गाचे हाल बेहाल झाले आहेत. या मार्गावरून प्रवास करणे खूप कठीण झाले असून या रस्त्याच्या दुरूस्ती करीता अनेक लोकांनी निवेदन सुध्दा दिले आहे. पण आता पर्यंत या मार्गावर कोणत्याच प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. खड्डे बुजविण्याकरीता ६ लाख रूपयांचा निधी आला पण तो निधी गेला कुठे कोणास ठावूक, या मार्गावरून रोज किती तरी शाळेकरी मुलं जिव धोक्यात टाकून भंडारा येथिल शाळेत शिकायला येतात. त्यांना काही झाल तर जिम्मेदारी कोणाची असेल? नेत्याची कि त्यांची स्वत:ची, या रस्त्यांच्या त्रासामुळे मुलांना शिकवायला पाठवायच की नाही? असा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना पडलेला असून सद्यस्थितीत भंडारा ते वरठी हा रस्ता विद्यार्थ्यांसाठी कर्दनकाळ बनला आहे. मागिल वर्षी याच रस्त्यावर सिरसी फाट्यावर खड्डे वाचवितांना एका इसामाचा अपघात झाला. त्या अपघातात ट्रकवाल्याने या इसामाला जोरदार धडक दिली.
या अपघातात त्याचे दोन तुकडे होउन त्याचा जागीच मृत्यू झाला, तरी प्रशासनाला जाग आले नाही. आणखी किती जीव हा रस्ता घेईल, हे न उलगडणारे कोडे आहे. भंडारा ते वरठी रस्त्याची हि अवस्था पाहून काही आॅटोचालक संघटना व तरूणवर्ग, जेष्ठ नागरिक यांनी पुढाकार घेत क्रिष्णा भुजबळ या युवकाचा वाढदिवस रस्त्यावरील खड्डयात साजरा करायचा निश्चय केला व बॅनर तयार करून ‘‘वाढदिवस आहे भावाचा, सत्कार आहे खड्ड्यांचा, प्रशासन आता तरी जागा हो, या खड्डयापासून आम्हाला मुक्त करा’’ अश्या प्रकारचा बॅनरवर तयार करून क्रिष्णा भुजबळ या युवकाचा वाढदिवस रस्त्यावरील खड्डयात साजरा करण्यात आला. त्यामध्ये सर्व प्रथम सकाळी ९ वाजता सर्व आॅटोचालक, जेष्ठ नागरिक, युवा वर्ग एकत्र येवून रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावण्यात आली. तर काही खड्डे बुजवण्यात आले. त्यानंतर खड्डयांसमोर क्रिष्णाला बसवून केक कापण्यात आला व तो केक प्रत्येक खड्डयाला ठेवूना अनोख्या प्रकारे वाढदिवस भंडारा ते वरठी रस्त्यावर साजरा करण्यात आला.
जेव्हा कि भंडारा ते वरठी मार्ग परिसरात २ आमदार व १ खासदार असून सुध्दा भंडारा ते वरठी मार्गाची दैनावस्था झालेली आहे. तरी सुध्दा सर्व नेते चुप का आहेत? त्यांना जनतेच्या जिवाची काहीच पर्वा नाही का? तर जनतेने दाद मागायला जायचं कुठे? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता तरी प्रशासनाला जाग येईल का कि पुन्हा नविन काही उपक्रम राबवाव लागेल, हा प्रश्न सर्व आॅटोचालक संघटना, तरूणवर्ग, जेष्ठ नागरिकांना पडलेला आहे. जर लवकरात लवकर भंडा-रा ते वरठी रस्त्याचे काम झाले नाही तर आॅटोचालक संघटना, तरूणवर्ग, जेष्ठ नागरिक व विविध संघटनेचे कार्यकर्ते जनआंदोन करू असा इशारा देण्यात आला आहे. या उपक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी क्रिष्णा भुजबळ मित्रपरिवार वरठी, हेमंत रघुते मित्रपरिवार भंडारा, आॅटो रिक्षा चालक/मालक संघटना वरठी/भंडारा व गोवर्धन निनावे, सुधीर सार्वे यांच्यासह जेष्ठ नागरिक गणेश पिपरोदे, कवडू धुले, दामोधर हूमने, सुर्यवंशी व समस्त भंडारा/वरठी येथिल तरूणवर्ग उपस्थित होते.
अन् रस्त्यावरील खड्डयात केक कापून केला स्वत:चा व खड्डयांचा वाढदिवस साजरा
गेल्या काही दिवसांपासून भंडारा ते वरठी रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. संबंधित विभागाला वारंवार सांगूनही या समस्येकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे भंडारा ते वरठी मार्गावरील दाबा गावाजवळ क्रिष्णा भुजबळ या युवकाच्या वाढदिवसानिमित्त खड्डयांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी केक कापून प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. रस्ता खड्डेमय झाल्याने अपघाताला निमंत्रण देणारा मृत्यूचा सापळा बनला आहे. वारंवार विनंती करून, प्रसंगी निवेदन देवूनही उपयोग होत नसल्याने रविवारी आॅटोचालक, तरुणवर्ग व जेष्ट नागरिकांनी भंडारा ते वरठी रस्त्यावर खड्डयांचा वाढदिवस साजरा केला.