भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : श्रावण महिन्याचे औचित्य साधून भंडारा वारकरी मंडळाच्या वतीने भव्य वारकरी संमेलन व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांच्या किर्तनाने संमेलनाची सांगता झाली. देश, धर्म आणि राष्ट्रासाठी वारक-यांची भुमिका अत्यंत महत्वाची असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. भंडारा वारकरी मंडळाच्या माध्यमातून भंडारा शहरात विविध उपक्रम राबविले जात असतात. श्रावण महिन्याचे निमित्ताने या संमेलनाचे आयोजन करण्याचा संकल्प मंडळाच्या वतीने सोडण्यात आला होता, तो १२ रोजी पूर्णत्वास गेला. शहरातील प्रशस्थ अशा लक्ष्मी सभागृहात संमेलन घेतले गेले. संमेलन सुरु होण्यापूर्वी सकाळी ८ वाजता शहरातील कोलबा स्वामी वार्डातील विठ्ठल रुक्मीणी मंदिरातून दिंडी काढण्यात आली. दिंडी नगर भ्रमण करुन कार्यक्रम स्थळी पोहचली. यावेळी मोठ्या संख्येने वारकर आणि नागरिक सहभागी झाले होते. सकाळी १०.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन झाले.
यावेळी खा. सुनील मेंढे, श्रीकांत नानोटी महाराज, कैलास वाघाये महाराज, अर्जुन गिरडकर महाराज, योगेश चकोले महाराज यांच्यासह अनेक संत आणि महाराज मंडळी उपस्थित होती. विठूमाऊलीची पूजा करुन संमेलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अनेक साधू, संतांचा सत्कार व काही महत्वाच्या विषयांवर चर्चा घेण्यात आली. संजय महाराज पाचपोर यांनी उपस्थितांना उद्बोधन केले. देशातील स्थिती पहाता, आज वारकरी संप्रदायाची भूमिका महत्वाची आहे. देश, धर्म आणि राष्ट्र जगवायचे असेल तर साधू संतांचे विचार आणि आचार गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी घेण्यात आलेल्या धर्मसभेचे संयोजक म्हणून हभप ओमदेव चौधरी महाराज यांनी जबाबदारी पार पाडली. या संमेलनाला जिल्हयातील ग्रामीण भागातूनही हजारो वारकरी बंधू भगिनी उपस्थित होत्या. पहिल्यांदाच अशा प्रकारचे वारकरी संमेलन आयोजित झाल्याने वारक-यांमध्येही चैतन्याचे वातावरण दिसून आले. भंडारा वारकरी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संमेलन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.